तुझं वय काय….

जोशी आजोबा गॅलरीत पेपर वाचत बसले होते. त्यांनी सहज नजर समोर वळवली तर त्यांना नेने आजोबा उत्साहात दुडूदुडू धावत कुठेतरी जाताना दिसले.नेने म्हणजे जोशींचे लंगोटीया यार.एकमेकांना टाळया देत त्यांचे हास्यविनोद चालायचे .चुकले तर एकमेकांची कानउघडणी करायचे. जोशी नेने म्हणजे सोसायटीतील जय-वीरू.
“कुठे पळत चाललाय हा नेन्या… एवढं वय झालंय पण पोरकटपणा जात नाही याचा” जोशी डोक्यावर आठ्या चढवून उठले आणि नेन्यांच्या मागे जाऊ लागले.नेने जिन्यावरून गच्चीवर जाताना दिसले म्हणून जोशीही त्यांच्या मागोमाग गच्चीवर जाऊन पोहोचले आणि तिथले दृश्य पाहून थक्क झाले.
गच्चीवर आठ दहा मुलांसोबत नेने पतंग उडवत होते.पतंगाची काटकाटी करत असताना मोठ्याने ओरडत होते आणि समोरच्याची पतंग कटल्यावर उडया मारून नाचत होते.
“नेन्या….” जोशींनी हाक मारली. “अरे जोश्या तू?” नेने मागे वळून म्हणाले.”हे काय चाललंय? अरे तुझं वय काय आणि तू करतोयस काय.शोभत का तुझ्या वयाला हे पतंग उडवनं आणि थयथया नाचणं” जोशी रागावून म्हणाले. “माझं वय 70 आहे आणि मी पतंग उडवतो आहे बरं जोशीबुवा” नेने डोळे मिचकावून खट्याळपणे म्हणाले.”आणि न शोभायला काय झालं ,पोरं तर म्हणता आहेत आजोबा you rocks…काय रे पोरांनो ?” मुलांनीही ओठाचा चंबू करत ऊ हू s s s s असा आवज काढून नेनेंच्या बोलण्याला दुजोरा दिला.”अरे पण तब्येतीचे काय ? इतक्या उन्हाचा पतंग उडवतो आहेस इथे, काही झालं म्हणजे.त्यापेक्षा गपगुमान घरात बसावे भजनं ऐकावीत आणि देवाचे नामस्मरण करावे ,आता आयुष्य तरी किती राहीलें आहे आपले” जोशी. “तेच म्हणतोय मी जोश्या आयुष्य तरी किती राहीले आहे आपले.”नेने म्हणाले “जेवढे राहिले आहे तेवढे उत्साहात, आनंदात काढू नये आपण?”
“आपल्याकडे एक समज आहे की, वयाची साठी झाली की आपण निवृत्ती घ्यावी. ते बरोबर ही आहे आपण निवृत्ती घ्यावी पण संसारातून संपूर्ण जीवनातून नाही.अरे हीच तर वेळ असते आपले राहिलेले स्वप्न, इच्छा पूर्ण करण्याची. आपण उलटं करतो .अजून संसारात गुंतत जातो. मुले संसार करत असतील तर त्यांनी आपण जसा केला तसा संसार करावा म्हणून हट्ट करत जातो.धड त्यांनाही काही नवीन करू देत नाही आणि आपणही काही करत नाही.त्यापेक्षा आपण जर आपले लक्ष आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यात, नवीन गोष्टी शिकण्यात घालविले तर आपणही खुश आणि ते ही खुश. आपल्या वेळी होत्या तश्या गोष्टी आता राहिल्या नाहीत म्हणून आपण सारख हळहळत असतो .आताचा काळ आपल्या काळाइतका चांगला नाही ,पण इतका वाईटही नाही .आताही शिकण्यासारखे भरपूर आहे .नवीन काही केले की आपले मन आणि शरीर दोघेही निरोगी राहतात. आणि आपण आनंदी असलो की भोवतालचे वातावरणही प्रसन्न राहते. आपले पूर्वज जसे जगत आले आपणही का तसेच जगावे?.आपल्या मनात आपल्या आजोबांची इमेज नेहमी मितभाषी,गंभीर,शिस्तप्रिय अशीच राहिली आहे ,आपल्या नातवांच्या मनात आपली इमेज roking, happy-go-lucky,jolly अशी राहीली तर बिघडलं कुठे? “
“मी नवीन गोष्टी स्वीकारतोय याचा अर्थ मी माझ्या सर्वच जुन्या गोष्टींचा त्याग करतोय असे नाही . अजूनही मी सकाळी उठून अगोदर देवपूजा करतो. सर्व सण समारंभ पारंपारिक पध्द्तीने साजरे करतो. पण या वयात काशीला जाण्यापेक्षा मला केप टाऊन ला जाऊन तिथले table mountain बघायला जास्त आवडेल.जितके पुस्तक वाचने आवडते तितकेच इंटरनेटवर blogs वाचनेही प्रिय आहे मला. जुन्या क्लासिक सिनेमा सोबत आताचे sci-fi सिनेमा सुद्धा बघायला आवडता मला.मला टिपिकल म्हाताऱ्यांप्रमाणे किरकीरत, पोराबाळांच्या नावाने ओरडत,आजारपणाची भीती मनात बाळगत काढायचे नाहीये. वाढत्या वयासोबत दुखणी पण येणारच पण तो पण एक आयुष्याचाच भाग आहे . त्याचा पण स्वीकार करायचा.बाकी आयुष्य तेच आहे आणि आपणही तेच आहोत दृष्टी बद्दलवायची फक्त. दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. कोणी एकाने म्हटलेच आहे,
” जिंदगी के रंगमंच पर
आखरी अंक चला रहा हू
बाकी खेल भी वही है और कहाणी भी वही है
बस किरदार निभाने का अपना तरिका बदल रहा हू “
“कोणी म्हटलंय हे? ” एवढा वेळ नेनेंचे बोलणे मनापासून ऐकत असलेले जोशी म्हणाले.
“मी” शांतपणे नेने म्हणाले .”फेसबुकवर पेज बनवलय मी,त्यावर असले काही पोस्ट करत असतो .तू ही अकाउंट बनव.आज ये माझ्या घरी माझा नातू मला पबजी शिकवणार आहे . येशील ना?”
“हो . नक्कीच.”जोशी उत्साहात म्हणाले. त्यांनीही ठराविक विचारांची चौकट आता सोडण्ययाचा निर्णय घेतला होता.

Leave a comment