सुनीता ..एका नामांकित कंपनीत मोठ्या पदावर काम करणारी मुलगी. अत्यंत हुशार आणि महत्वाकांक्षी .आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याची जिद्द मनात बाळगणारी. योग्य वयात येताच तिच्यासाठी वरसंशोधन सुरू झाले. आलेल्या स्थळांमध्ये निशांत चे स्थळ सुनीताच्या आई वडिलांना पसंत पडले.सुनीता आणि निशांतचे विचार एकमेकांशी जुळत असल्यामुळे दोघानीही घरच्यांना होकार कळविला आणि त्यांचे लग्न झाले.
काही दिवसानंतर सुनीता व निशांत कामावर रुजू झाले. निशांत चे एकत्र कुटुंब होते. घरात सुनीता ,निशांत मिळून एकूण पाच जण राहत होते.शिवाय सर्व नातेवाईकही आसपासच राहत असल्यामुळे घरी येणारे जाणारेही खूप होते. जोपर्यंत निशांत चे लग्न झाले नव्हते तोपर्यंत सुनीताच्या सासूबाई घरातले सर्व बघत होत्या. दोन्ही वेळेचा स्वयंपाक करणे , मुलांचे जेवणाचे डबे बनविणे,आल्या गेल्या लोकांचा पाहुणचार करणे हे सर्व त्या बघत होत्या. लग्न झाल्यानंतर आपोआपच ती सर्व जबाबदारी सुनितावर आली.सकाळी लवकर उठून ती सर्व कामे , स्वयंपाक आटोपून धावत पळत ऑफिस मध्ये पोहोचत असे.तिथे ती दिवसभर काम ,मिटीग्स मध्ये व्यस्त राहत असे आणि पुन्हा घरी येऊन सर्व कामे करत असे. घर आणि ऑफिस सांभाळताना तिची खूपच धावपळ होऊ लागली. पण तिची ही धावपळ तिच्या सासूबाईंच्या लक्षात कधी आलीच नाही .उलट सुनीताला आपल्याप्रमाणे नीट कामे जमत नसल्याची तक्रार त्या इतरांकडे करत असत. सतत च्या धावपळीचा परिणाम आता सुनीताच्या प्रकृतीवर आणि कामावर होऊ लागला. घरात कोणीतरी मदतीला असावे असे तिला प्रकर्षाने वाटू लागले. सासूबाईंनी ”माझ्याने आता होत नाही ” म्हणून कधीच हात वर उचलले होते. म्हणून निशांतशी चर्चा करून तिने घरकामासाठी बाई लावण्याचा निर्णय घेतला.त्याप्रमाणे तिने घराच्या साफसफाई साठी आणि स्वयंपाकासाठी बाई लावली. सासूबाईंनी खूप विरोध केला पण निशांत पुढे त्यांचे काही चालले नाही.
आता सर्व सुरळीत चालले होते. बाई लावल्यामुळे सुनीताला घर आणि ऑफिस व्यवस्थित मॅनेज करता येत होते. परंतु सासूबाईंच्या मनातील अढी कायम होती. आता तर सुनीता आपली मदतीची अपेक्षा न करता सर्व काही एकटयानेच सांभाळते आहे हे पाहून त्या अधिकच चिडल्या.घरातील आपले महत्व कमी झाल्यासारखे त्यांना वाटू लागले. त्यामुळे सुनीताच्या प्रत्येक गोष्टीत त्या चूका काढू लागल्या . घरी आलेल्या पाहुण्यांजवळ उगाचच तिच्या तक्रारी करू लागल्या. सुनीता समजदार असल्यामुळे तिने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले.
एके दिवशी निशांत चे काका काकू घरी आले होते . सुनीताने मावशींच्या मदतीने उत्तम स्वयंपाक केला . जेवण झाल्यावर काकू म्हणाल्या “सुनीता खरोखरच सुगरण आहेस हो तू .जेवण खूपच छान झाले होते “.सुनीता काही बोलायच्या आतच सासूबाई म्हणाल्या ” अग वीणा जेवण त्या बाईनी बनविले आहे. आमच्या सुनीताला कुठे करता येतोय स्वयंपाक .म्हणून तर बाई लावलीये . मला तर कधी गरजच पडली नाही स्वयंपाकासाठी बाई लावण्याची “.बाई ने स्वयंपाक बनविला ऐकून वीणा काकू कसेतरीच तोंड करू लागल्या आणि म्हणाल्या “अरेरे .. एवढी तरुण सून घरात असताना घरातल्या कामांसाठी बाई लावण्याची काय गरज. आमची जान्हवी तर स्वतःह सर्व बनविते तिला नाही आवडत कोणाच्याही हाताचे बनवून खाल्लेले”.”अग वीणा त्यासाठी सवय लागते कामे करण्याची आणि आई वडिलांचे संस्कारही असतात ते.पैसे असल्यावर काय गरज आहे स्वतःह सर्व करण्याची” सासूबाई सुनीताकडे पाहून खोचक स्वरात म्हणाल्या.
सासूबाईंचे हे बोलणे ऐकून सुनीताच्या तळपायाची आग मस्तकात गेली.ती म्हणाली “हो बनवलाय स्वयंपाक बाईने पण बनविताना लागणारे मीठ मसाल्याचे प्रमाण तर मीच ठरवलंय ना.आणि बाईने स्वयंपाक बनविला म्हणून काय झाले . ती पण तर माणसचं असतात ना. स्वतःह सर्व घरकाम करणारे चांगले असतात आणि बाई लावून घरकाम करवून घेणारे आळशी असतात असे कोणी सांगितले तुम्हाला? करवून घ्यायलाही तितकेच कौशल्य लागते.घरकाम करण्यासाठी लागणारा वेळ मी वाचवते आणि तो ऑफिसच्या कामासाठी वापरते.हा गलेलठ्ठ पगार मला उगाचच मिळत नाही त्यासाठी मी माझे रोजचे नऊ तास कंपनीला देते. या मिळालेल्या पगारातूनच आपल्या घराचा अर्धा emi भरला जातो,भविष्यात काही अडचण आली तर सेवींग्स पण यातूनच होते. मला वाटले तर मी सुद्धा नोकरी सोडून घरी राहू शकते , दुपारी आराम करू शकते परंतु एकट्या निशांत वर मला भार टाकायचा नाही . घराची अर्थिक जबाबदारी घेणे हे जसे त्यांचे कर्तव्य आहे तसे माझेही आहे. आणि तुम्हाला जर घरातले सर्व स्वतःह अगदी तुमच्यासारखी करणारी हवी होती तर मग तशीच सून शोधायची होती . सून नोकरी करणारी असावी हा अट्टाहास तुमचाच होता ना.काकू .. तुम्ही जान्हवी चे उदाहरण देताय मला.. जान्हवीच्या घरात किती लोक आहेत …फक्त ती आणि तिचा नवरा… त्यातही तिचा नवरा प्रत्येक कामात तिची मदत करतो.. अगदी भाजी चिरण्यापासून ते शिजविण्यापर्यंत. आई वडिलांचे संस्कार हे असतात. मला जर प्रत्येक जण एवढी मदत करणार असेल तर मी आत्ताच बाई सोडून देईल.बोला आई आहे तुम्हाला मंजूर?”
सासूबाई गप्प बसल्या. कधीही उलट उत्तर न देणाऱ्या सुनीताचा रुद्रावतार बघून त्या ही मनातून घाबरल्या. सुनीताला मात्र मन अगदी हलके झाल्यासारखे वाटत होते. आता सासूबाई परत कधीही ह्या विषयावर बोलणार नाहीत याची आता तिला खात्री होती